यवतमाळ : अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे सोयाबीन भिजल्यामुळे काळे पडू लागले आहे. याचा फायदा घेत खुल्या बाजारात व्यापार्यांनी सोयाबीनचे दर पाडले आहेत. सोयाबीनला शासनाने ३ हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. मात्र, खुल्या बाजारात सोयाबीनला अवघा दीड हजार रुपये क्विंटल भाव दिला जात असल्याने शेतकरी खुलेआम लुटला जातोय.
शेतीविषयक अपडेट्स व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
सततच्या पावसाने पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले असून याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र, अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा अवसानच गळाले आहे. शेतीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. आसमानी संकटांसोबत शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.