प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांचा सल्ला
परभणीः
शेतकर्यांनी योग्य बियाणे, आंतरपिक पध्दती, पिकांची फेरपालट आदी मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सेंद्रीय शेतीसाठी महत्वाचे आहे. युवा शेतकर्यांनी आपल्यातील ऊर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यशस्वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठेचे तंत्र अवगत करणे आवश्यक असल्याचा सल्ला प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांच्या वतीने मराठवाड्यातील 4 जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी परभणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले बोलत होते.
प्रमुख पाहूणे म्हणून मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचेप्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य शरद हिवाळे, डॉ. स्मिता सोळंके, संजय देशमुख (नोका, पुणे), डॉ. सतीश भोंडे, महेश सोनकुळ, डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीत अनेक अडचणी आहेत. यातील शेतमालाचा बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख समस्या आहेत. अशावेळी कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता यासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने पाहत आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकर्यांना लाभ होण्यास मदत होईल. अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी शरदराव हिवाळे यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती केल्यास फायदेशीर होईल. गट शेतीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था सोपी जावी म्हणून विद्यापिठ निश्चित पाठीशी राहील. संजय देशमुख यांनी, नांदेड जिल्हा सेंद्रीय शेतीच्या अवलंबामध्ये अग्रेसर असुन जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेती करणारे आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून त्यासाठी शेतकर्यांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल. तसेच डॉ. सईद इस्माईल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, रासायनिक खते व किटकनाशकांचा अयोग्य व अतिरेक वापरामूळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि किटकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढते आहे, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रात संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचे व सापळयांचे फायदे उपयोग व महत्व, डॉ. सतीश भोंडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये माती परीक्षणाचे महत्व, डॉ. सी.व्ही. आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ. ए. टी. शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापण तसेच डॉ. ए.एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास भेट देऊन शेतकर्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनील जावळे, शीतल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतीश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दीपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल