नवी दिल्ली / प्रतिनिधी
राज्यातील विविध भागात गंभीर झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता राज्याने 7 हजार 962 कोटी 63 लाखांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे सादर केला आहे. ही मदत लवकरात-लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवीदिल्ली येथे केली.
दुष्काळासह राज्यातील विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्याच्या भेटीवर आले असल्याचे सांगून राज्यातील दुष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच आवश्यक पावले उचलण्यात येतील, असे मिश्रा यांनी सांगितले. राज्याने सादर केलेल्या मदतनिधीच्या प्रस्तावाची प्रतही मिश्रा यांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अतिरिक्त 6 लाख घरांची मागणी
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला हक्काचा निवारा मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी सुरू आहे. मात्र, सर्वांसाठी घरे उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्याला आणखी घरांच्या मंजुरीची आवश्यकता आहे. त्यामुळे अतिरिक्त 6 लाख घर बांधणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या योजनेला गती मिळावी म्हणून राज्यशासन स्वत:ची जागा नसलेल्या लाभार्थ्यांस 500 चौरस फुट जागा खरेदीसाठी 50 हजार रूपयांचे अनुदान देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सीआरझेड अधिसूचना अंतिम करण्याची मागणी
राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी सीआरझेड संदर्भातील अधिसूचना लवकरात लवकर अंतिम करण्याचा विषयही मुख्यमंत्र्यांनी याबैठकीत मांडला. ठाणे येथील तुंगारेश्वर आणि सोलापूर येथील प्रसिद्ध माळढोक पक्षी वन्यजीव अभयारण्या संदर्भातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) अंतिम करण्याची विनंती यावेळी फडणवीस यांच्याकडून करण्यात आली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाहन वापरण्यात यावे
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात इको-टुरीझमला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने इ-वाहन वापरुन जंगल सफारी सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. इ-वाहन जंगल सफारी सुरु झाल्याने मानव व वन्यजीवांमधील संघर्ष कमी होण्याबरोबरच पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.