काही शेतकऱ्यांनी आम्हाला आंतरप्रवाही व स्पर्शजन्य यापैकी कोणते बुरशीनाशक वापरावे याबद्दल माहिती द्यावी अशा प्रकारचे मेसेजेस केले होते. म्हणून आज आपण याविषयी माहिती घेऊयात.
खरं तर दोन्हीही प्रकारची बुरशीनाशके आपापल्या जागी अतिशय उपयुक्त आहेत. मात्र कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक वापरावे याचा अभ्यास आपणच करायला हवा. वातावरण, झाडाची अवस्था, रोगाचे प्रमाण, इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन योग्य ते बुरशीनाशक निवडावे.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
स्पर्शजन्य बुरशीनाशके :
मॅन्कोझेब, थायरम, कॉपर, इत्यादी बुरशीनाशके ही स्पर्शजन्य या गटात मोडतात. ही बुरशीनाशके बऱ्याच वर्षांपासून वापरली जात आहेत, जी बुरशीच्या वाढीला अनेक प्रकारे अडथळा निर्माण करतात आणि तिला झाडामध्ये प्रवेश करण्यास अटकाव करतात. ही बुरशीनाशके झाडाच्या आत प्रवेश करत नाहीत. यांच्या अशा कार्यपद्धतीमुळे बुरशीमध्ये प्रतिकारक्षमता तयार होत नाही. म्हणून ही बुरशीनाशके वर्षानुवर्षे तितकीच प्रभावीपणे काम करत आहेत. परंतु ही बुरशीनाशके आंतरप्रवाही पेक्षा जास्त वेळा वापरावी लागतात.
आंतरप्रवाही बुरशीनाशके :
हेक्झाकोनॅझोल, कार्बेन्डाझिम, इत्यादी बुरशीनाशके या प्रकारात मोडतात. ह्या प्रकारची बुरशीनाशके वापरल्यानंतर झाडामध्ये अनेक ठिकाणी पोहोचतात. काही आंतरप्रवाही बुरशीनाशके ही “स्थानिक आंतरप्रवाही” म्हणजेच “Local Systemic / Translaminar” या प्रकारची असतात. ही बुरशीनाशके जर पानाच्या वरील बाजूला फवारली तर ती पानाच्या खालच्या बाजूला, जिथे फवारा पाहोचला नसेल तिथे देखील पोहोचतात. उदा. सायमोक्झानिल, ऍझोक्सीस्ट्रॉबिन, इत्यादी बुरशीनाशके या प्रकारात मोडतात. तसेच इतर काही आंतरप्रवाही बुरशीनाशके झायलेमद्वारे संपूर्ण झाडात पोहोचतात. म्हणून ही बुरशीनाशके अधिक प्रभावी ठरतात. मात्र, आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास बुरशीमध्ये त्यांच्या विरोधात प्रतिकारशक्ती तयार होते आणि ही बुरशीनाशके काम करेनाशी होतात.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
साधारणपणे, आंतरप्रवाही बुरशीनाशकांना पूर्णपणे प्रभावी होण्यासाठी ३ ते ५ दिवस लागतात. म्हणून ही बुरशीनाशके वापरताना बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे याची खात्री करावी. आपल्या झाडांवर किती प्रमाणात रोग आहे याकडे सतत लक्ष ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. बुरशीजन्य रोग येण्याआधी किंवा त्या रोगाची अगदी सुरुवातच असेल तरच आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणे योग्य ठरते. एकदा बुरशी वाढल्यावर ती आटोक्यात आणणे अवघड होऊन बसते म्हणूनच बुरशीनाशके योग्य वेळी वापरावीत.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.